Showing posts with label भावविश्‍व. Show all posts
Showing posts with label भावविश्‍व. Show all posts

Sunday, July 22, 2007

भावविश्‍व की "सेकंड लाईफ'

सध्या इंटरनेटवरील नेटिझन्सच्या "सेकंड लाईफ' या प्रतिसृष्टीबद्दल खूप बोलले, लिहिले जात आहे. याची तुलना विश्‍वामित्रांनी तयार केलेल्या प्रतिसृष्टीशी, रावणाच्या मायावीनगरीशी तसेच पांडवांच्या मयसभेशी केली जात आहे. त्यामुळे या "तथाकथित' "सेकंड लाईफ'बद्दल सहाजिकच कुतूहल निर्माण झाले. या आभासी जगातील राहणीमान, त्यातील अर्थकारण, जागेसंबंधी, व्यवहारासंबंधी तसेच हे जग कसे झपाट्याने वाढत आहे. त्याबद्दल अनेक जण आपली "तज्ज्ञ' मते व्यक्त करीत आहेत. तेथे घेण्यात येणाऱ्या अवताराबद्दल मोठी वर्णने वर्णिली जात आहेत. जणू काय हे "सेकंड लाईफ' म्हणजे मानवाच्या सध्याच्या जीवनाला (फर्स्ट लाईफ) पर्यायच आहे. मात्र, खरेच असे पर्याय होऊ शकतो का? असा प्रश्‍न मनात निर्माण झाला. त्यातून अनेक प्रश्‍नही निर्माण होत गेले.
"सेकंड लाईफ' या प्रतिसृष्टीत प्रवेश करण्यासाठी "अवतार' घ्यावा लागतो. कोणीही कोणत्याही प्रकारचा "अवतार' या जगात घेवू शकतो. त्याला काही बंधने नाहीत. त्यामुळे येथे साठ वर्षाचा म्हातारा अठरा वर्षाच्या तरुणासारखे रूप घेऊ शकतो. पाहिजे तशी वेशभूषा घेऊ शकतो. थोडक्‍यात म्हणजे आपण वास्तवात ज्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्या सर्व इच्छा या आभासी जगात पूर्ण करू शकतात. त्यामुळेच बहुतेकांचा याकडे ओढा असावा, अशी शक्‍यता वाटते. मात्र, या मुळे माझ्या मनात एक शंका उपस्थित होते. उपलब्ध माहितीनुसार, आपण या सेकंड लाईफ विषयी विचार केला तर यात मानवी भावनांचा तसेच सामाजिक जीवनाचा विचारच केलेला दिसत नाही. फक्त राहणीमान, आर्थिक स्थिती याबद्दल बोलले जाते. मग मानवाच्या भावनांचे काय? या आभासी जगात त्याला काही स्थान आहे की नाही. तेथे स्वच्छंद वागण्यासही मर्याद नाहीत. तेथे आपण कसेही वागू लागलो तर नियंत्रण कसे ठेवणार? जर आभासी जगातील "अवतार' वास्तव जगातही त्या प्रमाणेच वागू लागला तर.........
मानवी मन हे खूप चंचल आहे. अनेक गोष्टी करण्याची मनात इच्छा असते. मात्र काही कारणास्तव या वास्तव जगात त्या पूर्ण करू शकत नाही. त्या अनेक इच्छा मनातल्या मनात दबून जातात. त्यातून जर काही मार्ग निघाला नाही तर अनेकांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. यावर काही जण हे एक वेगळाच मार्ग काढतात. ते म्हणजे, आपल्याला काय करावे वाटते ते आपल्या मनातल्या मनात योजतात. म्हणजेच मनातच आपल्या गोष्टी पूर्ण करीत असतात. उदा. एखाद्या हिंदी चित्रपटातील हिरो सारखे वागता येत नसेल. तर मनातल्या मनात ते आपण हिरो आहोत, अशी कल्पना करतात. त्यामुळे ते आपल्याच "भावविश्‍वा'त रममाण झालेले असतात. त्याला आपण 'हुकलेले' असे म्हणत असतो. पण ते दुसऱ्याच विश्‍वात गेलेले असतात. याला आपण आपल्या जीवनातील "सेकंड लाईफ' का म्हणू शकत नाही. असे अनेक जण आपल्याला सापडतील जे आपल्याच भावविश्‍वात रममाण झालेले आढळतात. अशा काही जणांची अवस्था टोकाला जाऊन वेड लागण्याचीही शक्‍यता असते.
यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, नेटिझन्सच्या या "सेकंड लाईफ'बद्दल भारतातील, महाराष्ट्रातील किती जणांना माहिती आहे. त्यांना त्याबद्दल उत्सुकता आहे. याबद्दल शंकाच आहे. कारण इंटरनेटचा वापर भारतात वाढला तरी तो कोणत्या गोष्टींसाठी वाढत आहे याचाही विचार व्हायला हवा. आज तरुण पिढी इंटरनेट वापरण्यात आघाडीवर आहे. मात्र ते त्याचा वापर बहुतांश वेळा नोकरी शोधणे, चॅटिंग करणे, अश्लील साइट पाहणे, गेम्स आणि काही जण ब्लॉगिंग करणे यासाठी करतात. त्यातील काही टक्के हे माहितीसाठी इंटरनेटचा वापर करतात. साधारणतः काही अपवाद वगळता भारतातील चाळिशीच्या पुढची पिढी ही अजूनही इंटरनेट निरक्षर आहे. त्यामुळे नेटिझन्सच्या "आभासी जगात' तरुणच जास्त प्रमाणात दिसू शकतील. आज स्पर्धेच्या युगात त्यांच्या काही इच्छा अपूर्णच राहिलेल्या असतात. त्या इच्छा या "सेकंड लाईफ'मध्ये पूर्ण करता येतात. मात्र, त्यातून अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. या सर्व प्रश्‍नांचा तसेच चंचल मानवी मनाचा विचारच यात करणार आहोत की नाही. तसे नसेल तर मग आपल्या मनात असणारे भावविश्‍व हेच खरे "सेकंड लाईफ' होय.